StatCounter

Monday 27 November 2023

आजचा लोकसत्ता पेपर

आजचा लोकसत्ता बरा आहे. वाचायला बरे लेख आहेत. वित्त विभागातही बरे लेख आहेत. अग्रलेख तितकासा चांगला नाही.

Friday 3 February 2023

रवींद्रायन

स्थळवर्णन आणि व्यक्तिचित्रण करण्यात हातखंडा असलेल्या रवींद्र पिंगे (1926-2008) ह्यांच्या पश्चात त्यांच्या मुलाने प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या संकीर्ण ललित लेखांचा रवीन्द्रायन हा संग्रह आहे.

पिंगे अर्थशास्त्राचे पदवीधर होते. त्यांचे बालपण मुंबईत गिरगावात गेले.  पिंगे कुटुंब मूळचे विजयदुर्गाच्या जवळ असलेल्या `उपळे’ ह्या गावचे. संग्रहातले उपळे आणि कोकणातील इतर गावांचे मनोज्ञ वर्णन करणारे लेख विशेष वाचनीय आहेत. 319-pinge-ravindra-ramchandra_1

 

 

लेखक आणि लेखनाविषयीचे ह्या पुस्तकातील लेख सुद्धा वाचकांना नक्की आवडतील. ‘'मजकूर आशयसंपन्न असावा, आविष्कारशैली प्रवाही असावी, मजकुराची कागदावरील मांडणी नेत्रसुखद असावी, पुस्तकाचा बोलबाला व्हावा, गुंतवलेलं धन विक्रीतून चालीचालीनं वसूल व्हावं…’’ अशा लेखकाच्या माफक अपेक्षा त्यांनी सांगितलेल्या आहेत.

व्यक्तिचित्रणांमध्ये, अभिजात लेखन करणार्या हेन्री डेव्हिड थोरो ते इंदिरा संत ह्यांच्यापर्यंतच्या प्रसिद्ध आणि धुरंधर लेखकांची व्यक्तिचित्रे आहेत. स्थळवर्णन ऐतिहासिक तसेच निसर्गरम्य स्थळांचे आहे.

कोकणातील निसर्गाचे आणि खाद्यपदार्थांच्या चवीचे वर्णन करताना पिंग्यांची लेखणी विशेष बहरते. ‘पापलेट, सरंगे, कोळंबी, सुरमई, बांगडे, कान्टा, बोयटं, कर्ली, कालवं’ अशी सागरी मासळी त्यांना साद घालते. तांबड्या झाकेचा भात, कुळथाची पिठी, पडवळाची, किंवा दोडक्याची किंवा पाल्याची भाजी आणि फोडणीचं ताक हे अन्नब्रह्म…’’b81dfae8589040f6ac9725825a5c7ca3

 

पिंगे यांनी मंत्रालयात पंधरा वर्षे नोकरी केल्यानंतर १९६५मध्ये ते आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात साहाय्यक निर्माता म्हणून रुजू झाले. त्यानंतर आकाशवाणीसाठी त्यांनी डझनावारी नाटिका लिहिल्या. ‘बकुल फुल’, ‘शतपावली’ (१९७४), ‘देवाघरचा पाऊस’ (१९७५), ‘दिवे लक्ष्मण दिवे’ (१९८४), ‘अत्तर आणि गुलाबपाणी’  (१९९६) हे लेखसंग्रह; ‘आनंदाच्या दाही दिशा’ (१९७४), ‘आनंदव्रत’ (१९८३), ‘दुसरी पौर्णिमा’ (१९९६) ही प्रवासवर्णने; ‘पश्चिमेचा पुत्र’ (१९७२), ‘पिंपळपान’ (१९८६), ‘हिरवीगार पानं’ (१९९२) ही पाश्‍चात्त्य साहित्याचा परिचय करून देणारी पुस्तके; ‘परशुरामाची सावली’ (१९७०) ही कादंबरी; ‘प्राजक्ताची फांदी’ (१९७८), व ‘सुखाचं फूल’ (१९८१) हे कथासंग्रह; असे विविध स्वरूपाचे लेखन पिंगे यांनी केले. विशेष म्हणजे त्यांचे सुमारे दोनशे ललितलेख ‘माणूस’ साप्ताहिकातून सतत पाच वर्षांच्या प्रसिद्ध कालावधीत झाले. ‘साहित्यसूची’चे ते लेखक आणि संपादकीय सल्लागार होते. ‘सर्वोत्तम रवींद्र पिंगे’, तीनशे भारतीयांची व्यक्तिचित्रे, पाश्चात्त्य साहित्यसेवकांचे दोनशे परिचय, शंभर प्रवासवर्णने, हजारो पुस्तक परीक्षणे, साठ मानपत्रे, पाच-सहाशे ललितलेख, पन्नास कथा आणि तितकेच अनुवाद ही पिंगे यांची लेखनसंपत्ती होय. पिंगे यांच्या लेखनाला वाचकांनी भरभरून प्रेम दिले, दाद दिली.(

https://maharashtranayak.in/paingae-ravaindara-raamacandara )

 

इतिशोध

पद्मगंधा प्रकाशनातर्फे सुमारे 25 वर्षांपूर्वी प्रकाशित करण्यात आलेले 'इतिशोध' हे इतिहास संशोधक सुरेश जोशी ह्यांचे 172 पानांचे पुस्तक नुकतेच वाचनात आले. लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांचे हे संकलन आहे.

पुस्तकाच्या प्रस्तावनेत श्री. निनाद बेडेकर म्हणतात, '' इतिशोध हे आत्मचरित्र नव्हे. ऐतिहासिक साधने गोळा करण्यासाठी केलेल्या कष्टमेहनतीची ती एक गाथा आहे, किंवा व्यथा आहे.'' शिलालेख, ताम्रपट, मूर्ती, चित्रे, नाणी, खापरे, कागदपत्रे अशीच इतिहास संशोधनाची साधने असतात. ऐतिहासिक साधने संगृहीत करून ठेवण्यास मिळालेली दृष्टी हे खरे तर ह्या मेहनतीमागचे भांडवल आहे.

श्री. सुरेश जोशी 40 वर्षे अहमदनगर ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाचे कार्यकारी विश्वस्त होते. पुण्यातील राजा केळकर वस्तुसंग्रहालयाचे क्युरेटर म्हणूनही काही काळ त्यांनी काम पाहिले आहे.

नगरच्या ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयातील दुर्मीळ, साधनांचा प्रचंड संग्रह त्यांच्या परिश्रमाची, चिकाटीची आणि जिद्दीची साक्ष आहे. हा बहुमोल संग्रह गोळा करताना अनेक व्यक्ती, समाज आणि प्रसंग ह्यांचा श्री. जोशी ह्यांच्या संवेदनशील मनाने घेतलेला शोध असे ह्या 'इतिशोधाचे' स्वरूप आहे.WhatsApp Image 2023-01-28 at 12.08.03

महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार ह्यांचा सहवास आणि मार्गदर्शन आणि त्यांच्याशी असलेला घरोबा ह्याविषयी जोशी ह्यांनी समरसून लिहिले आहे. सेतुमाधवराव पगडी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, डॉ. सांकलिया, डॉ. पु. म. जोशी, प्रा. राम शेवाळकर, न. र. फाटक, बाबासाहेब पुरंदरे, अशा अनेक दिग्गजांशी आलेला संबंध आणि किस्से जोशींनी वर्णिलेले आहेत.

संशोधन कार्यात स्वत:ला पूर्णपणे झोकून देणार्या व्यक्ती दुर्मीळ होत चाललेल्या ह्या काळात श्री. जोशी ह्यांच्यासारख्या माणसांची आगळीवेगळी मुलुखगिरी वेगळी उठून दिसते.

Monday 20 December 2021

व्यवस्थापन : माणसांचे आणि मुलांचे

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मुख्यालयामध्ये 6व्या मजल्यावर मुंबई पोर्ट ट्रस्टचे ग्रंथालय होते (कदाचित अजूनही ते तेथे असेल). मुंबई पोर्ट ट्रस्टच्या स्पोर्ट्स क्लबची ग्रंथालये वेगळी. कॉन्फरन्स हॉलजवळचे हे ग्रंथालय जरा गंभीर पुस्तकांचे होते. शिपिंग डिप्लोमा करीत असताना अभ्यास करण्यासाठी मला ह्या ग्रंथालयाचा खूप उपयोग झाला. इंडियन शिपिंग, व्हॉएज अकाउंटिंग, कॅरिएज ऑफ गुड्स बाय सी अॅक्ट अशा विषयांवरील पुस्तके व नियतकालिके येथे मिळत.

ह्या ग्रंथालयाचे व्यवस्थापन 'नियोजन व संशोधन' विभागाकडे होते. डॉ. सुब्रतो रे (व्ही शांताराम ह्यांचे जावई) हे या विभागाचे प्रमुख होते आणि वेळोवेळी ते ग्रंथालयात येत असत. आपली अनेक पुस्तकेही त्यांनी ग्रंथालयाला भेट दिली होती. ग्रंथपाल मॅडम माझ्या ओळखीच्या झाल्या होत्या आणि त्या मला ती पुस्तके आवर्जून दाखवत.

Great Ideas in Management हे C N Parkinson, M K Rustomji आणि 9788170943402-usS.A. Sapre या लेखकांचे पुस्तक मला इथेच मिळाले. पार्किन्सन ह्यांच्यासारख्या ख्यातनाम आंतरराष्ट्रीय तज्ञासोबत भारतीय सहलेखक पाहून मला बरे वाटले.

नंतर एकदा जे. जे. हॉस्पिटलजवळ नॅशनल बुक ट्रस्टच्या भांडारात गेलो होतो तिथे स. आ. सप्रे ह्यांचे ''आपले काम, आपले जीवनसर्वस्व'' हे पुस्तक दिसले आणि तिस-या सहलेखकाचे पुस्तक आणि तेही मराठीतून सापडल्याचा आनंद झाला. पुस्तक अतिशय प्रेरणादायक वाटले. नेहमीच्या motivating book सारखे अजिबात नाही. अलंकारिक वगैरे तर नाहीच. काम करा, भरपूर काम करा, दुसरा मार्ग नाही काम करा असे सारखे लिहिले आहे. तरीही परत परत वाचावेसे वाटले. index

स. आ. सप्रे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुद्रणतज्ञ होते. चर्नीरोड स्टेशनजवळच्या शासकीय मुद्रणालयाचे ते संचालक होते. आयुष्याच्या संध्याकाळी वास्तव्यासाठी ते दहिसरला आले. त्यांचे मला एक पत्र आले आणि त्यात त्यांनी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाला काही पुस्तके देणगी देण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यांच्या घरी गेलो असता एका प्रचंड रेकॉर्डरूममध्ये गेल्याचा भास झाला. दाटीवाटीने ठेवलेल्या स्लॉटेड अँगल्सच्या रॅक्सवर पुस्तके खच्चून भरलेली होती. अलिबाबाची गुहा! पुढेपुढे ते संध्याकाळी दहिसर रेल्वे स्टेशनवर येऊन बसत तेव्हा त्यांच्याशी गप्पा मारण्यास मी जात असे.

नंतर यथावकाश दुस-या सहलेखकाचे 'Children: How to Manage Them Now that You've Got Them' (C. Northcote Parkinson ; M.K. Rustomji ; S. Pavri) मजेशीर पुस्तक हाती लागले. आता झालीयत ना मुलं, मग त्यांwpid-20131030_163334ना सांभाळायचं कसं? खरंतर ह्या छोटेखानी पुस्तकात मजकूर असा कमीच आहे. मुख्य आहेत ती मारिओ मिरांडा ह्यांची चित्रं. अप्रतिम आहेत. इंग्रजी सायंदैनिकांचा तो जमाना होता आणि मारिओ ह्यांच्या अनोख्या शैलीतील चित्रांचा खूपच प्रभाव होता. आज ही चित्रे पाहताना आपण अधिकच अचंबित होतो. हे आता हरवले आहे अशी हुरहुरही वाटते.

बालसंगोपनाचा विषय निघाल्यावर मला आणखी एक छान पुस्तक आठवतंय. बालसंगोपन ह्या विषयावरील पुस्तकांना काही तोटा नाही. एकूणच सेल्फ हेल्प बुक्स खंडीभर मिळतील. पण तरीही माझ्या आवडीची पुस्तकं होती फ्लॅश बुक्स सीरीजमधली. THE POCKET LIBRARY OF MODERN LIVING म्हणून ती युरपमध्ये प्रकाशित होत असत. CONTRACT BRIDGE, CHESS, सौंदर्यप्रसाधन, अशा अनेकविध विषयांवर लिहिलेली ती पुस्तके होती. खरंच देखणी पॉकेट बुक्स होती 4.5'' x 4.5'' अशा छोट्या आकाराची. लिश्टनस्टाइनमध्ये छापलेली आणि बेल्जियममध्ये प्रकाशित होणारी. हल्ली दुर्मीळ झालेली आहेत. रद्दीच्या दुकानात जर मिळाली तर सोडू नका, अवश्य खरेदी करा. WhatsApp Image 2021-12-20 at 23.04.22

ह्याच फ्लॅश मालिकेतलं एक पुस्तक आहे 'ब्रिन्गिन्ग अप युवर चिल्ड्रेन' . छोट्या आकाराच्या दीडशे पानांमध्ये आवश्यक आणि उपयुक्त अशी प्राथमिक माहिती ओघवत्या भाषेत मांडलेली आहे. माहिती कितीही दिलेली असली तरी कमीच वाटते. पण छोटेखानी फ्लॅश बुक्सचं वैशिष्ट्य असं ती वाचल्यावर आपल्याला बरीच माहिती झाली असं WhatsApp Image 2021-12-20 at 23.05.49समाधान मिळतं. पुस्तकावर संपादकीय संस्कार अतिशय सफाईनं केलेले दिसतील.

अनेक चांगल्या गोष्टी लुप्त होत जातायत. फ्लॅश बुक्सचं कालौघात लुप्त होणं आणि आपलं हळहळणं असंच एक भाबडं दुःख.

Tuesday 14 September 2021

अभिनयाची तंत्रे

काल अनिकेत विश्वासराव ह्याची विक्रम गोखले ह्यांनी घेतलेली मुलाखत1 कुतूहल म्हणून पाहिली. विक्रम गोखले ह्यांना मुलाखत देताना  अनिकेतवर दबाव आलेला दिसत होता. आपले वडील श्री. शेखर विश्वासराव ह्यांची पार्श्वभूमी अनिकेतने सांगणे अपेक्षित होते; ती तशी त्याने सांगितली. श्री. शेखर विश्वासराव ह्यांनी दिग्दर्शित केलेल्या दोन नाटुकल्यांमध्ये काम करण्याची संधी मला शालेय जीवनात मिळालेली आहे. तालमीच्या वेळी शिस्त पाळण्याविषयी त्यांचा कटाक्ष असे.

543703887.0.m.1विक्रम गोखले ह्यांनी चरित्रकार म्हणून विशेष प्रसिद्ध असलेल्या रोनाल्ड हेमन2 ह्या ब्रिटिश नाटककार आणि समी़क्षकाच्या एका पुस्तकाचा उल्लेख केला. 'टेकनिक्स अव अॅक्टिंग' हे त्याचे नाव. रोनाल्ड हेमनने लिहिलेली चरित्रे मी वाचलेली नाहीत पण त्याने केलेले समीक्षात्मक लेखन वाचलेले आहे. त्यामुळे रोनाल्ड हेमन हे नाव ऐकल्यावर मी कान टवकारले. 41LgD7YPMuL._SX331_BO1,204,203,200_'हाउ टू रीड अ प्ले' असेही त्याचे एक गाजलेले पुस्तक आहे.

अभिनयाची तंत्रे शिकण्यासाठी तशी स्तानिस्लावस्कीची3 चार पुस्तके आहेत. पण  पुस्तके वाचून अभिनय थोडाच शिकता येतो?

Stanislavsky प्रणाली4 म्हणजे काय हे थोडक्यात जाणून घेण्यासाठी हे संकेतस्थळ पाहावे. `अभिनय’ ह्या विषयावरील मराठी विश्वकोशातील नोंदही5 लक्षणीय आहे.

संदर्भ :

1. https://www.youtube.com/watch?v=oCe0dFKjMXU

2. https://en.wikipedia.org/wiki/Ronald_Hayman

3. https://en.wikipedia.org/wiki/Konstantin_Stanislavski 

4. https://mr.eferrit.com/stanislavsky-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80/

5. https://vishwakosh.marathi.gov.in/26240/

Wednesday 16 June 2021

वेरुळ आणि ज्ञानदृष्टी

लोकराज्य(१) हे महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणारे मासिक केवळ शासकीय स्पर्धा परी़क्षांच्या विद्यार्थ्यांनाच उपयुक्त असते असे नाही. लोकराज्यचे विशेषांक मान्यवरांच्या लेखनाने सजलेले असतात आणि संग्राह्य असतात. मासिकाच्या संकेतस्थळावर किंवा इंटरनेटवर इतरत्र अथवा ग्रंथालयांमधून ह्या अंकांचे नीट जतन करण्याचे काम कोणीतरी तडीस नेईल अशी आशा करूया.

लोकराज्यच्या नोव्हेंबर २०११ च्या अंकात  पुण्यभूषण डॉ. गो. बं. देगलूरकर एम.ए. (इण्डॉलॉजी)(२) ह्यांचा एक सुंदर लेख आलेला आहे. हा अंक चित्र-शिल्प विशेषांक आहे. लेखाच्या पहिल्या परिच्छेदात त्यांनी उत्तम शिल्पकलेमागचे तत्त्वज्ञान स्पष्ट केले आहे. देगलूरकरांचे मूर्तिशास्त्रातील विद्यार्थी श्री. उदयन इंदूरकर ह्यांनी ह्या तत्त्वज्ञानाच्या आधारे लिहिलेली 'अद्भुत शिल्प; वेरुळ' ही 56 पृष्ठांची पुस्तिका आमच्या शेजारी राहणा-या ऋचा राऊत ह्यांनी वाचायला दिली. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये त्या प्राध्यापिका आहेत. ह्या पुस्तकाच्या वाचनाने आगळावेगळा आनंद दिला.

वेरुळची लेणी मी पाहिली आहेत. पण अशा ठिकाणी आपला मार्गदर्शक ज्या वकूबाचा असतो आणि आपल्यापाशी जो काही वेळ असतो त्यावर, किंबहुना पाहणारा कोण आहे यावर अशा सौंदर्यानुभवाची प्रत अवलंबून असते.

श्री. उदयन इंदूरकर ह्यांची दृष्टी ह्या विषयातील तज्ज्ञाची तर आहेच शिवाय ती ज्ञानेश्वरीच्या आणि संतवा‌ङ्मयाच्या आध्यात्मिक सत्संगातून सिद्ध झालेली आहे. शिल्पसौंदर्य नेमकेपणाने पाहण्याची, विराट शिल्पकृतीच्या निर्मितीतील कलाकाराची प्रतिभा हेरण्याची ही दृष्टी आहे. ही दृष्टी दिल्याबद्दल इंदूरकर आपल्या गुरुंविषयी कृतज्ञता व्यक्त करतात, ती ह्या दोन ओव्यांमधून-

गुरु स्नेहाचिये दृष्टी । मी पृथ्वी होईन तळवटीं ।

ऐसिया मनोरथांच्या सृष्टी । अनंता रची ।। 414 ज्ञा - 13

तैसा गुरुकुळाचेनि नावें । महासुखे अति थोरावे ।

जे कोडेंही पोटाळावें । आकाश कां ।। 383 ज्ञा - 13

इंदूरकर पुढे म्हणतात की ज्ञानेश्वरीतील शिल्पशास्त्रविषयक संदर्भ सरांनीच शोधले आणि पुढे अधिक शोधण्याची प्रेरणाही त्यांनीच दिली. ह्या अभ्यासयात्रेतील अनुभवाचे वर्णन करण्यासाठीही ते ज्ञानेश्वरीचा आधार घेतात -

नातरी रंके निधान देखिलें । का आंधळिया डोळे उघडले ।

भणंगाचिया आंगा आले । इंद्रपद ।। 382 ज्ञा - 13

भारतीय वास्तू आणि शिल्प ह्यांचे वेगळेपण सांगताना इंदूरकर म्हणतात, ''हिंदू धर्म, तत्त्वज्ञान आणि संस्कृती कलेच्या माध्यमातून पोहोचविण्याचे असाधारण कार्य सहस्रावधी वर्षे नृत्य, नाट्य, संगीत, चित्रकला इ. माध्यमांमधून सुरू होते. शिल्पकारांनी ह्याचा कळस केला. `शब्देवीण संवादिजे' ह्या पद्धतीने दगडात शिल्पे कोरून हे विचारधन त्यांनी शाश्वत केले.

पुण्यभूषण पुरस्कार मिळाला त्यावेळी दिलेल्या एका मुलाखतीत(३)(४) डॉ. गो. बं. देगलूरकर म्हणतात, "… मंदिर स्थापत्य व मूर्ती हाताळताना केवळ तेवढे पाहणेच पुरेसे नसते. या दोन्ही गोष्टी जेव्हा प्रगत होत गेल्या, तेव्हा त्यामागे असणारा सांस्कृतिक ठेवाही लक्षात घ्यायला माझ्या पार्श्वभूमीची मदत झाली. उदाहरणार्थ, एखादी मूर्ती साकार होताना ती मूर्ती भक्तांना व तेव्हाच्या समाजाला ज्या गुणांची आवश्यकता आहे ते गुण साकारते. कारण मूर्तिपूजा म्हणजे केवळ मूर्तिपूजा नसून, ती गुणांची, तसेच त्यामागच्या तत्त्वज्ञानाची पूजा असते…"

पुस्तिकेमध्ये वेरुळच्या दशावतार, रामेश्वर आणि कैलास ह्या तीन प्रमुख हिंदू लेण्यांचा परामर्श घेतलेला आहे व ह्या शिल्पांमधील संकल्पना विविध सुभाषितांच्या व ओव्यांच्या आधारे स्पष्ट केल्या आहेत.

गजलक्ष्मीच्या शिल्पाविषयी लिहिताना इंदूरकर `लक्ष्मी' ही संकल्पना स्पष्ट करून सांगतात. लक्ष्मी हे परिपूर्ण असे निसर्गाचे वैभव म्हणजे सृष्टीच्या समृद्धीचे चिह्न आहे, लक्ष्मी म्हणजे केवळ धनसंपदा नव्हे.

का कमलकंदा आणि दुर्दरीं । नांदणूक एकेचि घरीं ।

परि परागु सेविजे भ्रमरीं । येरां चिखलुचि उरे ।।58।। ज्ञाने - 09

कामदेव-रतिचे शिल्प कितीही मधुर, मीलनाचे व्यक्तिकरण असले तरी तो विषयरूप मगरीचाच जबडा आहे.

एकीं वयसेचें जाड बांधलें । मग मन्मथाचिये कासे लागले ।

ते विषयमगरी सांडिले । चघळूनियां ।।85।। ज्ञाने - 07

सरिता मंदिर ह्या भव्य शिल्पामध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती ह्या तिन्हीं नद्यांचे शिल्पांकन केले आहे. प्रयागचा हा संगम महाराष्ट्रात साकार केला आहे. तिन्ही नद्यांच्या मूर्ति त्रिभंगात असून स्वभाव विशेषानुसार त्या कशा वेगवेगळ्या घडविल्या आहेत ह्याचे मनोज्ञ रसग्रहण पुस्तकात आहे.

मीनले गंगे यमुनेचे ओघ । तैसें रसां जाहलें प्रयाग ।

म्हणोनि सुस्नात होय जग । आघवें येथ ।।6।।

माजीं गीता सरस्वती गुप्त । आणि दोनी रस ते ओघ मूर्त ।

यालागीं त्रिवेणी हे उचित । फावली बापा ।।7।। ज्ञाने - 11

असे गूढगुंजन करणार्या समर्पक ओव्या लेखाने उद्धृत केल्या आहेत.

अवकाश आणि काळ एकमेकांमध्ये कसे मिसळलेले असतात हे सांगणारे `शेषशायी अनंत' ह्या काळाच्या शिल्पाचे वर्णन असून त्या अनुषंगाने केलेले सगळेच तत्त्वज्ञानपर विवेचन वेधक आहे. 'अहमेवक्षयः कालो' (गी - 10-33) ह्या संकल्पनेचे निःशब्द निरूपण करणारे हे शिल्प आहे.

जो प्रळयतेजा देत मिठी । सगळिया पवनाते गिळी किरीटी ।

आकाश जयाचिया पोटी । सामावले ।।272।। ज्ञाने - 10

ऐसा अपार जो काळु । तो मी म्हणे लक्ष्मीलीळु ।

मग पुढती सृष्टीचा मेळु । सृजिता तो मी ।। 273 ।। ज्ञाने - 10

येथे लक्ष्मीलीळु ह्या विशेषणासंबंधाने लेखकाने केलेले विवेचन विशेष वाचनीय आहे.

पुस्तिकेत शिल्पांची छायाचित्रे तर आहेतच पण अनेक शिल्पांचे रसग्रहण करताना गुरुकृपेने ज्ञानपूत अशा दृष्टीचा प्रत्यय लेखकाने दिलेला आहे. त्याचे थोडक्यात वर्णन वर केले आहे. ही पुस्तिका केवळ 56 पानांची असली तरी तिच्यातील अनेक चिंतनस्थळे आणि शब्दशिल्पे अरूपाचे रूप दाखविणारी आहेत. पदोपदी थांबून मागे वळत वळत, वाचक ह्या लेखनाचा आनंद घेत राहतो.

डॉ. गो .बं. देगलूरकर यांनी भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेमध्ये दि. १९/१२/२०१८ रोजी दिलेले ’कैलास लेणे एक अदभूत शिल्प’ ह्या विषयावरील व्याख्यान इंटरनेटवर उपलब्ध आहे.(५) वेळात वेळ काढून ते ऐकावे असे आहे.

संदर्भ :

(१) https://dgipr.maharashtra.gov.in/lokrajya-marathi

(२) https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B.%E0%A4%AC%E0%A4%82._%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0

(३) डॉ. गो .बं. देगलूरकर ह्यांच्या मुलाखतीचा वृत्तांत - https://www.bytesofindia.com/newsdetails?NewsId=5207579624637229517&title=Interview%20of%20Dr.%20G.%20B.%20Deglurkar&SectionId=1002&SectionName=Be%20Positive&TagName=Vivek%20Sabnis&NewsTagId=5408018058250405668&BM=False&FW=False&ITG=False

(४) डॉ. गो .बं. देगलूरकर ह्यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ - https://www.youtube.com/watch?v=bQ0sRCU2ud0

(५) डॉ. गो .बं. देगलूरकर यांच्या व्याख्यानाचा दुवा - https://www.youtube.com/watch?v=CnK8Jpd5o0Y

(६) मिसळपाव ह्या संकेतस्थळावरील वेरुळविषयक लेख आणि छायाचित्रे - https://www.misalpav.com/node/30895

15b673ca-1c45-4680-89d9-d0100dee37faa1c0ba9d-dd3f-48ab-a210-fa16a9f66849

Friday 1 January 2021

गीताचिकित्सा

'' चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः....'' ह्या गीतेतल्या तिसर्या अध्यायातील श्लोकापासून गीतेतील प्रतिपाद्य विषयांच्या संगतीबाबत माझा गोंधळ सुरू होतो. गीतेतील श्लोकांची संगती ह्या विषयाचीही चर्चा सहज कुठेही आढळत नाही. माझ्या आठवणीनुसार हा विषय माझ्या वाचनात प्रथम आला तो `विनोबा सारस्वत' ह्या पुस्तकातील विनोबांच्या लेखामध्ये. प्रा. राम शेवाळकर ह्यांनी साहित्य अकादमीसाठी संकलित केलेल्या विनोबांच्या निवडक साहित्यात हा लेख अंतर्भूत केलेला आहे.

त्यानंतर ह्या विषयाशी पुन्हा ओळख 2017 साली झाली. आम्ही उरळीकांचन येथील निसर्गोपचार आश्रमात राहिलो होतो. त्यावेळी तेथील ग्रंथभांडारातून श्री. भाऊ धर्माधिकारी ह्यांचा `गीताचिकित्सा' हा ग्रंथ घेऊन वाचला आणि गीतेतील श्लोकांच्या संगतीचा विषय पुन्हा डोळ्यांखालून गेला. प्राज्ञपाठशाळा मंडळ, वाई, ह्यांनी 1992 साली प्रकाशित केलेल्या ह्या ग्रंथाला मे. पु. रेगे ह्यांची विवेचक प्रस्तावना आहे. भाऊ धर्माधिकारी ह्यांचा पिंडच `आध्यात्मिक आणि चिंतनशील' आहे आणि संपूर्ण भगवद्गीता त्यांना मुखोद्गतही आहे तसेच गीतेवर भाष्य करण्यासाठी ते निःसंशय अधिकारी व्यक्ती आहेत अशी माहिती ह्या प्रस्तावनेत मिळते.

गीतेचा सखोल अभ्यास सादर करताना गीता ही महाभारतामध्ये प्रक्षिप्त कशी आहे, अनेक पुनरुक्त / विसंगत प्रतिपादने असलेली गीता ही एका व्यक्तीने केलेली रचना नसून 11 विभिन्न तत्त्वचिंतकांनी केलेल्या प्रतिपादनांचे हे संकलन आहे असे त्यांनी तर्कशुद्ध मांडणीतूgeetachikistaa-frontन सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

ज्ञानेश्वर, शंकराचार्य, विनोबा, टिळक, गांधीजी वगैरे गीताभाष्यकारांची कुठे कशी अडचण झाली आहे व त्यावर त्यांनी कसा मार्ग काढला आहे ह्याचेही दिग्दर्शन ह्या पुस्तकात पदोपदी आढळते. श्रद्धेला धक्का न लागेल अशा बेताने भाष्यकारांनी ह्या तडजोडी केल्याचे सांगतानाच प्रत्यक्ष श्रद्धा म्हणजे काय ह्याचाही सुंदर ऊहापोह लेखकाने केलेला आहे.

हा ग्रंथ वाचल्यावर पुन्हा गीता वाचताना वेगळ्या दृष्टीने प्रतिपाद्य विषयाकडे न पाहणे केवळ अशक्य आहे. गीतेकडे अधिक डोळसपणे `ती जशी आहे तशी' पाहता येणे सुलभ होईल असे वाटले. ग्रंथ टीकात्मक असला तरी गीतेचा अनादर होईल असे काहीही त्यात नाही हे विशेष होय.

आपले मत ठसविण्यासाठी विवेचनाच्या ओघात ह्या ग्रंथात अनेकदा पुनरुक्ति झालेली जाणवते पण एका प्रकारे ती क्षम्यही आहे. ग्रंथ वाचून झाल्यावर गीतेतील कल्पनाविस्तार आणि व्यत्यास शोधून काढणार्या लेखकाच्या मर्मग्राही अभ्यासदृष्टीचा प्रभाव मनावर जाणवत राहतो.

श्री. नागेश वासुदेव गुणाजी ह्यांनी भाषांतरित केलेली सार्थ श्रीमद्भवद्गीता केशव भिकाजी ढवळे प्रकाशनाने प्रकाशित केलेली आहे. पुस्तकाला असलेली भाषांतरकाराची प्रस्तावना वाचत असताना गीताचिकित्सा ह्या ग्रंथाची पुन्हा आठवण झाली. गीतेची मुख्य शिकवण ह्या शीर्षकाखाली प्रस्तावनेत नित्य'युक्त' आणि भक्त ह्यांच्यातील अभिन्नत्व गीतेत प्रतिपादित केले आहे असा विचार मांडलेला दिसतो.

गीताचिकित्सा ह्या ग्रंथाचे परीक्षण विद्वानांनी कसे केले आहे ह्याचा काहीसा शोध घेतला तेव्हा सुरेन्द्र बारलिंगे ह्यांनी 'परामर्श' त्रैमासिकासाठी केलेले 10 पानी परीक्षण सापडले.

परीक्षणाच्या अखेरीस त्यांनी गांधीजींचे ह्याबाबतचे (बारलिंगे ह्यांना न पटणारे) विचार दिलेले आहेत. (मला मात्र ते पटले, असो.)

गांधीजी लिहितात, ''सन 1888-89 मध्ये गीतेचे प्रथम दर्शन झाले तेव्हाच मला वाटले की हा ऐतिहासिक ग्रंथ नाही तर त्यात भौतिक युद्धाच्या वर्णनाच्या निमित्ताने प्रत्येक मनुष्याच्या हृदयात निरंतर चाललेल्या द्वंद्व-युद्धाचेच वर्णन आहे. मानुषी योद्ध्यांची रचना हृदयगत युद्धाला रसिक बनविण्यासाठी उभी केलेली कल्पना आहे. ही प्राथमिक स्फुरणा धर्माचा आणि गीतेचा विशेष विचार केल्यानंतर पक्की झाली… महाभारत हा ग्रंथ मी आधुनिक अर्थाने इतिहास मानत नाही.''

आनुषंगिक लाभ : गीताचिकित्सेच्या परीक्षणाचा शोध घेताना दोन गोष्टी सापडल्या -

1. 'परामर्श' ह्या पुणे विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभागाच्या त्रैमासिकाचे गेल्या 27 वर्षांचे अंक.

http://unipune.ac.in/snc/cssh/ipq/ParamarshMarathi/Cover03.html

2. भाऊ धर्माधिकारी ह्यांनी संपादिलेला मराठी-गुजराती शब्दकोश. ह्या कोशात मराठी शब्दांचे अर्थ गुजरातीमध्ये (पण देवनागरी लिपीमध्ये) दिलेले आहेत.

https://epustakalay.com/book/185804-marathi-gujrati-shabdkosh-by-bhau-dharmadhikari/